Breaking News
recent

मलकापूर शहरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा

 


मलकापूर

मलकापूर शहरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून ‘माझे शहर सुंदर शहर’ संकल्पानेला मलकापूर नगर परिषदेच्या वतीने तिलांजली फासल्या जात असल्याचे चित्र आहे. तेव्हा शहरातील स्वच्छतेबाबत न.प. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अन्यथा न.प. कार्यालयावर गाढव मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी एका निवेदनाद्वारे न.प. मुख्याधिकारी यांना दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘स्वच्छ भारत अभियान’ माध्यमातून ‘माझे शहर सुंदर शहर’ ही संकल्पना राबविण्याकरीता दरवर्षी लाखो-करोडो रूपयांचा निधी हा नगर परिषदांना देण्यात येतो. या अभियानातून शहरात स्वच्छता, नाल्या साफसफाई, कचरा संकलन व आदी बाबी करण्याचे नियोजन असते. मात्र मलकापूर शहरात केवळ भिंती रंगविणे व काही दिवस अभियानाबाबत फ्लेक्स लावून अभियान राबविण्याचा गवगवा करण्याचाच अनुभव मलकापूर शहरातील जनतेला येत आहे. 

शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असून नाल्यांची साफसफाई व कचऱ्याचा प्रश्न हा जैसे थे असाच असून एक प्रकारे स्वच्छ भारत अभियानाला कोठेतरी न.प. प्रशासनाच्या वतीने तिलांजली फासल्याचाच प्रकार दिसत आहे. शहरात नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविणे हे नगर पालिका प्रशासनाचे काम आहे. मात्र न.प. प्रशासनाकडून नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याला कोठेतरी दुर्लक्षीत केल्या जात असल्याचेच प्रकर्षाने दिसते. शहरात अनेक भागात नाल्यांची दयनीय अशी अवस्था आहे, तर अनेक भागात नाल्या ह्या कचऱ्याने भरलेल्या आहेत. काही भागातील नाल्या अशा आहेत की त्यातून पाणीच वाहून जात नाही. त्याचप्रमाणे कचरा यांचही प्रश्न हा एैरणीवर आलेला आहे. आता पावसाळ्याचे दिवस तोंडावर आहेत, पावसाळ्यात पावसाचे पाणी हे नाल्यांमधून वाहने गरजेचे असते. मात्र शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल-बेहाल होतील हे आजच्या परिस्थितीवरून दिसते. त्यामुळे याकडे न.प. प्रशासनाने तात्काळ लक्ष देवून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी अजय टप यांनी केली आहे.

येत्या काही दिवसात हा प्रश्न न.प. प्रशासनाने मार्गी न लावल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लवकरच नगर पालिका कार्यालयावर गाढव मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Powered by Blogger.