Breaking News
recent

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय



प्रतिनिधी नागेश सुरंगे

७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना १८२ मतं पडली. तसेच १५ मतं अवैध ठरली.

    पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांची भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना १८२ मतं पडली. तसेच १५ मतं अवैध ठरली. जगदीप धनखड ११ ऑगस्टरोजी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

  दरम्यान, विद्यमान उपराष्ट्रपती वैंकया नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टरोजी संपणार आहे. त्यामुळे भारताचे १४ वे उपराष्ट्रपतील म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाली आहे. जनता दल (युनायटेड), वायएसआरसीपी, बसपा, एआयएडीएमके यांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने धनखड यांचा पक्का मानला जात होता. तर अल्वा यांना आम आदमी पार्टी (आप), झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) यांचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसनंतरचा दुसरा सर्वात मोठा विरोधीपक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) पाठिंबा मिळवण्यात अल्वा यांना अपयश आले होते.

    तृणमूल काँग्रेसने मतदानात भाग न देता गैरहजर राहणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. दोन्ही सभागृहांतील तृणमूलच्या ३७ खासदारांनी मतदान केले नाही. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुबेंदू अधिकारी यांचे वडील आणि खासदार शिशिर अधिकारी तसेच, बंधू दिबेंदू यांनी धनखड यांना मतदान केले. याशिवाय भाजपचे सनी देओल, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यांच्यासह काही खासदारही मतदानासाठी संसद भवनात आले नाहीत.

    भाजपकडे दोन्ही सदनांत मिळून राज्यसभेतील पाच नियुक्त खासदारांसह ३९१ संख्याबळ आहे. शिवाय, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, शिंदे गटातील १२, बहुजन समाज पक्ष, तेलुगु देसम, अकाली दल या पक्षांनीही धनखड यांना पािठबा दिला. या पक्षांच्या ८१ सदस्यांची मतेही एनडीएच्या पारडय़ात पडली. त्यामुळे धनखड यांना ५२८ मते मिळू शकली.

    विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना २७ टक्के मते मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, आप, तसेच तेलंगण राष्ट्र समिती आदींनी  अल्वा यांना पािठबा दिला होता. यापूर्वी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोपाल कृष्ण गांधी यांना ३२ टक्के मते मिळाली होती. अल्वा यांना मात्र जेमतेम २७ टक्के मते मिळवता आली.

महाराष्ट्रातील ७ खासदार गैरहजर

    शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील लोकसभेतील पाचही खासदारांनी मतदान केले नाही. विनायक राऊत, अरिवद सावंत, राजन विचारे, संजय जाधव आणि गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे खासदार गैरहजर राहिले. राज्यसभेतील खासदार संजय राऊत ईडीच्या कोठडीत असल्याने त्यांनाही मतदान करता आले नाही. प्रकृतीच्या कारणास्तव अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हेही अनुपस्थित राहिले. शिंदे गटातील १२ खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.



Powered by Blogger.