सिंदखेडच्या रामेश्वर विद्यालयात २००६-०७ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
आजच्या धावपळीच्या जीवनात आनंद कुठे शोधायचा असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. स्वार्थीपणाच्या दुनियेत दोस्ती हे एकमेव नाते निव्वळ आणि निर्मळ स्वच्छ पाण्यासारखे असते. तोच धागा विणण्याचा अनुभव सिंदखेड येथील रामेश्वर विद्यालयाच्या २००६ - ०७ च्या बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला. तब्बल १८ वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी ताज्या करत एक दिवसाची शाळा भरवून त्या काळातील विद्यार्थ्याची भूमिका घेतली होती.
परमपुज्य गुरु गणपत बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रामेश्वर विद्यालय सिंदखेड मध्ये शैक्षणिक वर्ष -२००६ -०७ मध्ये इयत्ता दहावी च्या वर्गात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी यांच्या संकल्पनेने विद्यालयात एक दिवसाची शाळा भरवून माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थेची स्थापना करणारे कै.रामदास (भाऊ) दगडुजी करांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सचिव/ मुख्याध्यापक संभाजीदादा करांडे उपस्थित होते. यावेळी सर्व गुरुजनांचा सत्कार संपन्न झाला शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी शिकवलेले धडे, दिलेला अभ्यास, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मुख्याध्यापक संभाजी करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्नेह मेळाव्यास उपस्थित सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस भेट वस्तू देण्यात आली. यावेळी जेष्ठ शिक्षक गोवर्धन बांगर , जोगदंड सर , आजबे सर , शेरकर सर , हर्षे सर , पंडित सर , लिंमकर सर , वखरे मामा यांच्यासह आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह.भ.प किर्तनकार चंद्रशेखर वारे यांनी तर आभार गोवर्धन बांगर यांनी व्यक्त करुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
विद्यार्थ्यांनी ताज्या केल्या बालपणीच्या आठवणी…
त्याकाळी विद्यार्थी दशेत कोणालाही काहीच समजलें नसेल, पण आज १८ वर्षानंतर जमलेल्या विद्यार्थांना २००६-०७ च्या काळात गेल्याची अनुभूती आली. इतक्या काळानंतर एकत्र आलेल्या मित्र - मैत्रिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सर्वांनी एकमेकाचे स्नेह वृद्धिंगत केले. शाळेच्या निमित्ताने का होईना इतक्या वर्षांची विचारपूस करण्याची जणू नामी संधी उपलब्ध झाली होती. त्याचे सोने करत सर्वांनी खूप आनंद घेतला. - अशोक जाधव, (ग्रा.पं. सदस्य चिखली)