Breaking News
recent

धानोरा येथे घडलेल्या कोलते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या नुकसान भरपाई बाबतचे महाविद्यालयातर्फे तहसीलदार व कंपनीला निवेदन

 


श्रीकांत हिवाळे

मलकापूर - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर धानोरा येथे बस व मोटरसायकलचा अपघात दिनांक 24 एप्रिल रोजी झाला. या अपघातात पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते महाविद्यालयातील पॉलिटेक्निक मध्ये इलेक्ट्रिकल शाखेत दुसऱ्या वर्षात शिकत असलेला चांदुर बिस्वा येथील फरदीन खान अय्याज खान हा 18 वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला.

    मे.कल्याण टोल इन्फॉस्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडून राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून धानोरा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कंपनीचे मलकापूर पासून नांदुरा पर्यंत तसेच पुढेही अत्यंत ढिसाळ पद्धतीने व निष्काळजीपणाने काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना नाही, परिणामी मलकापूर ते नांदुरा रस्त्या दरम्यान कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. कित्येकांना कायमचे अपंगत्व येऊन घरी बसावे लागले. काहींचा सोन्यासारखा संसार उध्वस्त झाला तर काहींना वृद्धापकाळाचा आधार गमवावा लागला. या भीषण अपघातात जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी याकरिता कोलते महाविद्यालयातर्फे संबंधित कंपनीला तसेच मलकापूर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

    सदर निवेदनात कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी असे नमूद केले आहे की, अपघात झालेल्या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असताना कुठलेही मार्गदर्शक सूचना फलक नाही तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे गतिरोधक सुद्धा नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या बसने धडक दिल्यामुळे विद्यार्थ्याला जागीच आपला जीव गमवावा लागला. हा विद्यार्थी पुढील वर्षी पास होऊन कंपनीत किंवा नोकरीत रुजू झाला असता तर त्याला कमीत कमी सुरुवातीला 17,000/- हजार एवढा पगार असता आणि दरवर्षी दहा टक्के पगार वाढ गृहीत धरली  तर वयाच्या 58 व्या वर्षी त्याचे उत्पन्न जवळपास 14865900/- रुपये एवढे असते. 

   तरी हा अपघात केवळ कंपनीच्या चुकीमुळेच झाल्यामुळे विद्यार्थ्यांला जीव गमवावा लागला. त्याची नुकसान भरपाई देऊन कुटुंबियांना कंपनीकडून 30 लाख रुपये देण्यात यावे, अन्यथा आम्हाला कोर्ट मधून न्याय मागावा लागेल असे या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले. संबंधित कंपनी अधिकाऱ्यांना निवेदन देताना पॉलिटेक्निक चे इन्चार्ज प्राध्यापक संदीप खाचणे, निलेश राजपूत, भूषण ठाकरे, साकेत पाटील, स्नेहल पवार, शिवानी बोंडे व शुभांगी निवाने आदी यावेळी उपस्थित होते.

Powered by Blogger.