सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करावे- पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
![]() |
सिंदखेडराजा विकास आराखडा बैठक |
बुलडाणा सिंदखेडराजाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता सर्वंकष विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याठिकाणी विविध ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंचे संवर्धन करावे लागणार आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सोयी – सुविधांची निर्मिती करावी लागणार आहे. तरी सिंदखेड राजा विकास आराखडा बनविताना येथील सर्व ऐतिहासिक वारशाचे संवर्धनाच्यादृष्टीने कामांचा समावेश करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभगृहात सिंदखेडराजा विकास आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. यावेळी सिं.राजा नगराध्यक्ष सतिष तायडे, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक श्रीमती वहाने आदींसह केंद्रीय पुरातत्व विभाग, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुतळा बारव पर्यंत रस्ता बनिवण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, रस्ता बनविण्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच सिंदखेडराजा येथे 100 बेडचे रूग्णालय करण्यासाठी जागा शोधावी. जागा मिळाल्यास तातडीने प्रस्ताव सादर करावा. केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाच्या वास्तूंची कामे करण्यासाठी एकच आर्कीटेक्ट असावा. पुरातत्व विभागाचा प्रस्ताव व यंत्रणांच्या कामांचा प्रस्ताव स्वतंत्र तयार करण्यात यावा. तसेच संग्रहालयामध्ये त्याकाळातील पोषाख, शस्त्रास्त्र यांच्यासाठी दालन करावे. माहितीच्या दालनात परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती असावी. संग्रहालये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असावे. कामाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड नसावी. याप्रसंगी राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग, क्रीडा विभाग, एमटीडीसी, नगरपालिका यांचे सादरीकरण करण्यात आले.
सिंदखेडराजा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा येथील नियोजन भवनातील सभागृहात सिंदखेडराजा परिसरातील मातोश्री पांदण रस्ते, वीज पुरवठा, रस्ते, जलजीवन मिशन, इमारत बांधकाम आदी विकासकामांचा आढावा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. शिंगणे म्हणाले, शेतकऱ्यांची अडचण ओळखून शासनाने पांदण रस्त्यांची योजना आखली आहे. याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य कार्यवाही करून पांदण रस्ते पुर्णत्वास जातील, यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळण्यासाठी आवश्यक असलेले रोहित्र उभारण्याचे काम गतीने पूर्ण करावेत. सध्या घरगुती वापराबाबत कोणतेही भारनियमन करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात रस्ते ही महत्वाची बाब असून राष्ट्रीय महामार्ग, राज्य शासन आणि नाबार्डच्या माध्यमातून खडीकरण, रूंदीकरण, डांबरीकरण, पुलांची कामे पुर्ण होण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक असणाऱ्या मंजुरी वेळेत घेऊन कामे सुरू करावीत. विभागातर्फे प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांबाबत पाठपुरावा करण्यात यावा.जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचा योजना राबविण्यात येत आहे. मंजूर योजना कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया गतीने पुर्ण करण्याच्या सुचना डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिल्या.