मंत्री महोदय येणार म्हणून पाणीपुरवठा सुरळीत
नागेश सुरंगे प्रतिनिधी
देवधाबा ग्रामस्थांना दिलासा :२५ दिवसांपासून बंद होता पुरवठा
देवधाबा येथे एका कार्यक्रमानिमित्त आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे शनिवारी देवधाबा येथे येत आहेत. येथील २५ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा मंत्री महोदय येणार म्हणून शुक्रवारी सुरू करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला तरी नेहमीच हा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. देवधाबा येथील पाणीपुरवठा हा बऱ्याच दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील महिला वर्ग संतप्त झाला होता.
आता मंत्री महोदयांकडे येथील नागरिकांनी आपल्या गावातील पाणीटंचाईची तक्रार करू नये व प्रशासकीय यंत्रणेचे वाभाडे समोर येऊ नये या करिता २२ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा शुक्रवारी दुपारपासून सुरू करण्यात आला. देवधाबावासीयांना मंत्री महोदय येण्याअगोदर पाणी मिळाले हे बरे झाले, मात्र आता जशी येथील पाणीपुरवठ्याच्या बाबतीत प्रशासकीय यंत्रणा सजग झाली तशी या अगोदर झाली असती तर देवधाबावासीयांचे पाण्यासाठी हाल झाले नसते, एवढे मात्र नक्की
नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना द्याव्या
देवधाबा येथील ३९ कुटुंबातील धनगर समाजातील बांधवांना घरकुले मंजूर झाली असून भविष्यात मिळतीलच, मात्र येथील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा नेहमीच सामना करावा लागतो, यामुळे विलंबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यातील अडथळा दूर करून नियमितपणे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्या, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधन व्यक्त होत आहे.