"हे माझ्या बहिणी घट्ट मिठीतून तू का ग निघून गेलीस"?
![]() |
सदाभाऊंनी लाडक्या बहिणीसाठी हंबरडा फोडला |
चिखली /मनोज जाधव
मरळनाथपूर या छोट्याशा गावामध्ये खऱ्या अर्थाने सदाभाऊ लहानाचे मोठे झाले, इवलसं गाव डोंगर कपारीमध्ये असणारी त्यांची शेती,उन्हाळा आला की सगळं बोखाडमाळ त्यांना डोळ्यासमोर पहायला मिळायचं, रानामध्ये जनावरांच्या मागं ते आपल्या भावंडासह गेले की पायामध्ये सड, बोराडीचा काटा आणि अनेक काटे कुटे पायात घुसायचे, घरात आलं की काटा घुसलेल्या पायाला बिब्याचा नाहीतर गुळाचा चटका दिला जायचा, पाय बांधला जायचा आणि दुसऱ्या दिवशी काटा काढला जायचा,काटा जरी काढलेला असला तरी कळ मारावी म्हणून बिब्याचा चटका दिलेला असायचा,सणावाराला कधीतरी पुरणपोळी खायला मिळायची,चपातीने तर कधी त्यांना तोंड देखील दाखवलच नव्हतं, काळी पडलेली हायब्रीड ज्वारीची भाकरी ही त्यांच्या ताटात असायची,भात कधीतरी नवसालाच असायचा अशा सगळ्या गरिबीमध्ये त्यांचा चाललेला प्रपंचाचा गाडा, गाई म्हशीचं दूध दुभतं फक्त मात्र घरात भरपूर असायचं,दूध भाकरी खायचा एक वेगळाच गोडवा मनामध्ये राहायचा, तीन चुलते त्यांची मुलं असं नाही म्हटलं तरी त्यांचा सगळा पंधरा-सोळा माणसांचा खटाला होता.
त्यांचं घर मात्र एक लहानसं खुराडंच होतं, त्याकाळी गरिबीनं मोठं घर बांधायला सुद्धा उसंत दिलेली नव्हती,कालांतराने घरातली ती सर्व बहिणी भावंडं मोठी झाली,राहायला मग त्यांनी शेतामध्ये घर बांधायचा निर्णय घेतला, पालाच्या घरामध्ये काही दिवस राहिल्यानंतर त्यांचे दोन चुलते मुंबईला आले, मुंबईला कमावलेला पैसा जमवून दगड मातीच कौलारू घर शेतामध्ये उभं राहिलं,उभ्या राहिलेल्या घरामध्ये ते सर्व बहिणी भावंड राह्यला लागले त्यांच्या घराशेजारी माळरानांवर आजूबाजूला कुणाचंही घर नव्हतं एकमेवं घर होतं ते फक्त त्यांचंच, काळोख्या रात्रीनंतर दिवस उजाडला कि त्यांना हायसं वाटायचं, रात्री चोरा चिलटांचं भय असायचं, अशा ह्या भीतीच्या छायेखालीच ते भावंडासह लहानाचे मोठे झाले.
पाहुणा पै आला तरच कुणी सोबत असायची, अशा दारिद्र्यात कधी भाजीला तेल आहे तर कधी चटणी नाही, कधी भाजीऐवजी ठेचा तर कधी लाल मिरचीची चटणी आणि बुक्का असं बेताचं त्यांचं राहणीमान होतं, रानातल्या पालेभाज्या खाऊन ही ते धडधाकट होते, ह्या गरिबीमध्ये कधी श्रीमंतीचं वारं सुद्धा कधी त्यांनी पाहिलं नसल तरी ते बहिणी भावंडं आनंदाने एकत्र राहत होते ह्या दारिद्र्याच ओझं घेऊन ते जगले, ह्या दारिद्र्यामध्येच त्यांच्या लाडक्या बहिणीचं लग्न झालं.
४ जूनला त्यांच्या बहिणीच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं त्यावेळेस त्या मुंबईलाच होत्या, म्हणून त्यांना मुंबईतच एका छोट्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि त्यांना हृदयाचा आजार असल्याचं निदान झालं,सदाभाऊ कांदा परिषदेला नाशिकच्या दौऱ्यावर होते, भाऊंना चुलत भावाचा फोन आला कि रुक्मिणीची तब्येत बिघडली तर आता काय करावं डॉक्टर म्हणतात कि इथं ऑपरेशन होत नाही लगेच सदभाऊंनी आपल्या लाडक्या बहिणीला के. ई. एम हॉस्पिटल घेऊन यायला सांगितलं आणि लगेच ते कार्यक्रम आटपून धावतपळत मुंबईला बहिणीजवळ आले आणि आपल्या बहिणीला गुच्छ दिला आणि म्हणाले तुला लवकर बरं करायचं आहे,त्यांच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू खुललं अन तसं बहिणीनं अंथरुणावर उठून सदाभाऊंच्या कंबरेला मिठी मारली, मिठी मारल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले हि वेड्या बहिणीची वेडी माया आता त्यांना वाट्लं हि लवकर बरी होईल त्यानंतर सकाळी ते डॉक्टरांशी बोलले उद्याच्याला ऑपरेशनला घ्यायचा निर्णय झाला.
८ जून २०२२ ला सदाभाऊ दुपारी कामानिमित्त बाहेर आले आणि दुपारी त्यांना त्यांच्या भाच्याचा फोन आला, भाऊ धाप वाढलीय तुम्ही लगेच दवाखान्याकडे या सदाभाऊ तात्काळ दवाखान्याकडं धावत पळत गेले आणि बहिणी कडे गेले असता माहीत झालं की त्यांना मिठी मारणारी बहीण त्यांच्या मिठीतून निघून गेलेली होती,त्यावेळेस "हे माझ्या बहिणी घट्ट मिठीतुन तू का ग निघून गेलीस?"असे दुःखद उद्गार एका भावाच्या वाणीतून निघाले या बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सदभाऊंच्या मनातील बहिणीविषयीचा लेखाजोखा एका कष्टकरी शेतकरी नेत्याने बहिणीसाठी फोडलेला हंबरडा जसाच्यातसा सदभाऊंचे निकटवर्तीय रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडला.