Breaking News
recent

पोलीस कर्मचाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीची विभागीय पोलीस आयुक्ताकडे निवेदनाद्वारे अजय टप यांची मागणी

 

मलकापूर प्रतिनिधी 

        अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.श्रवण दत्त यांच्या पथकातील कर्मचारी व बुलडाणा एलसीबी पथकातील पोलीस कर्मचारी गजानन माळी यांची खातेनिहाय चौकशी होवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांनी विभागीय पोलीस आयुक्त अमरावती यांच्याकडे आज ७ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बुलडाणा जिल्ह्यामध्ये विशेषत विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर तालुका व परिसरात अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणावर बोकाळलेले आहेत. या अवैध धंद्यामुळे अनेक तरूण देशोधडीला लागले आहेत व लागत आहेत. एकीकडे अवैध धंदे बंद करण्यासाठी तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे भासविण्यात येत, व त्याकरीता पथकाची नेमणूक सुध्दा करण्यात आलेली आहे. अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे हे काम करतांना काही पोलीस बांधंवाकडून प्रयत्न केले जात असतील ही यात दुमत नाही. मात्र आजरोजी बुलडाणा जिल्ह्यासह मलकापूर शहर व परिसरामध्ये हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या अवैध धंदे वाल्यांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही किंवा त्यांना एक प्रकारे पोलिस प्रशासनाचे वतीने अभय मिळत असल्याचे दिसून येते. 

    अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता एलसीबी पथकाची नेमणूक असते. बुलडाणा जिल्ह्यात एलसीबीचे पथक नेमण्यात आलेले असून मलकापूर उपविभागात सुध्दा एलसीबी विभाग कार्यरत आहे. मात्र आजरोजी होणाऱ्या कारवाया ह्या मोठ्या माशांना सोडून छोट्यांवर कारवाई करण्या इतपतच हे एलसीबी पथक काम करीत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जणू मोठ्या अवैध धंदेवाल्यांना अर्थपूर्ण अभय देण्याचे कामच केले जात असल्याचे यावरून दिसून येते. बुलडाणा एलसीबी पथकातील पोकॉ. गजानन माळी यांचे या अवैध धंदे वाल्यांना मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण सहकार्य होत असून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे. तेव्हा त्याची खातेनिहाय चौकशी झाल्यास याबाबत सत्यता समोर येईल. त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सुध्दा अशाच प्रकारचे कार्य करीत असल्याने त्यांची सुध्दा खातेनिहाय चौकशी होणे गरजेचे आहे.

तेव्हा या कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी होवून दोषी आढळणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अजय टप यांनी शेवटी केली आहे.

Powered by Blogger.