मनरेगाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे यंत्रणांना निर्देश
वाशिम : जिल्हयात मनरेगाच्या वतीने " ग्रामसमृद्धी व सुविधा संपन्न कुटुंब मिशन " राबविण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,वन अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व इतर कार्यक्रम अधिकारी यांना कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. यामध्ये यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायमध्ये किमान 25 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सेफझोनमधील प्रत्येक ग्रामपंचायतसाठी किमान 25 विहिरींचा वैयक्तिक लाभ व सेमी क्रिटिकल झोनमधील प्रत्येक ग्रामपंचायतसाठी किमान 25 समूह सिंचन विहीरीचा लाभ इच्छुक अर्जदारांना द्यावयाचा आहे. यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करुन घेणे, लाभार्थ्यांची निवड करणे,पंचायत समितीस्तरावर प्रस्तावाची छाननी करून कामांना वर्क कोड देणे, तांत्रिक मान्यतेचे आदेश तयार करून घेणे व प्रशासकीय मान्यता देण्यासाठीची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश आहे. यासोबतच प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये किमान 10 शेततळे, 4 हेक्टर फळबाग लागवड, 2 हेक्टर बांधावर वृक्ष लागवड, 2 हेक्टर रेशीम लागवड, 2 हेक्टर बांबू लागवड, किमान 50 जलतारा (शेतातील शोषखड्डा) याबाबतचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सामाजिक वनीकरण, वन, रेशीम विभागाचे अधिकारी यांनी तातडीने नियोजन करावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज,जॉबकार्ड,गाव नमुना आठ,सातबारा व प्रतिज्ञापत्र, आधार क्रमांक लिंक करण्यात आलेल्या बँक पासबुकची छायांकित प्रत आदी कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत संबंधित कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे सादर करावे. असे आवाहनही श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.