पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई
– महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे
वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ही २० जुलै रोजी
महाराष्ट्रात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात
आली आहे.
शिष्यवृत्ती
परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. यावर्षीसुद्धा २० फेब्रुवारी
रोजी परीक्षा घेतली जाणार होती. यादृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात
अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न
मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही
परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर एकीकडे दहावी आणि बारावीची बोर्ड
परीक्षा आणि दुसरीकडे टीईटी परीक्षेतील गैरप्रकार, यामुळे
शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या कंपनीला द्यावी? असा प्रश्न परीक्षा परिषदेसमोर होता. मात्र आता सरकारने विनर कंपनीच्या
सहकार्याने परीक्षा घेण्यासंदर्भात सूचना दिली असल्याची माहिती आहे. परीक्षा
परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची सुधारित माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध
करण्यात आली आहे. राज्यभरातून यंदा इयत्ता पाचवीचे ४ लाख १० हजार ३९५ आणि इयत्ता
आठवीचे २ लाख ९९ हजार २५५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी
महिन्यात होणारी परीक्षा आता जुलै महिन्यात होणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष
सुरू झाल्यानंतरच या शिष्यवृत्ती परीक्षेला मुहूर्त लागला आहे.