मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे - दिनेश गीते
बुलडाणा, (जिमाका) दि. 15: येणाऱ्या मान्सुन काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी पूर्ण करुन घ्यावी. जीवीत व वित्त हानी टाळण्याकरीता क्षेत्रीय सर्वेक्षण करुन यंत्रणा सज्ज ठेवावी. यासाठी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती दिनेश गीते यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 13 मे रोजी मान्सुनपूर्व तयारी बाबत निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. संभाजी पवार यांनी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत पी पी टी द्वारे माहिती सादर केली.
पावसाळ्याच्या काळात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले, संबंधित सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. याशिवाय नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण, महापारेषण, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, परिवहन विभागाने अधिक दक्ष राहावे. पावसाळ्यात प्रामुख्याने नदीकाठच्या गावांबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील मुख्य नद्या पैकी असलेल्या पैनगंगा,पूर्णा, खडकपूर्णा काठच्या गावांबाबत प्राधान्याने सतर्क राहावे. छोटे नाले, ओढे, नद्या, यांना अचानक येणाऱ्या पुराच्यावेळी दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी. ज्या गावांमध्ये, वसाहतींमध्ये अतिपर्जन्याची शक्यता आहे, तसेच गेल्या वर्षात ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे, अशा सर्व ठिकाणी स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, शाळा, समाज मंदिर, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. त्या जागी औषधी, पाणी, जेवणाची व्यवस्था राहिल याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने छोटे/मोठे पुलांचे सर्वेक्षण करुन त्यांची दुरूस्ती करुन घ्यावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या काठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती कामे पूर्ण करावीत. धरणे, पाझर तलाव या ठिकाणी 24 तास देखरेख यंत्रणा तयार ठेवावी. पुरप्रवण क्षेत्र/गावे याबाबत लाल व निळ्या गावांबाबत माहिती घेऊन संबंधित यंत्रणेसह सतर्क राहावे. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तात्काळ काढण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, हवामान खात्याच्या संपर्कात राहून दक्षतेचे इशारे, सुरक्षेचे उपाययोजना म्हणून वेळेत सर्व यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांपर्यत माहिती पोहोचवावी. तसेच राष्ट्रीय/राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात रहावे. त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती करुन घ्यावी. नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाई, ड्रेनेज, पाईपलाईन दुरूस्ती तात्काळ करण्यात यावी. धोकादायक व अनधिकृत होर्डिग ताबडतोब काढावेत. आपत्तीजन्य परिस्थितीत सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे. पूर्णा नदी ही अकोला व अमरावती जिल्ह्यातील उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास त्या अनुषंगाने पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घ्यावा. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक, पाणीपातळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग इत्यादी बाबींचे संनियंत्रण करावे. पाणीसाठा, धरण सुरक्षा, पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करावयाच्या उपाय योजना याबाबत आराखडा निश्चित करावा.
यावेळी बैठकीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातील के.एस.जाधव, रविकांत बनगाळे, योगेश घोपे सेतू विभाग तसेच शिपाई श्री.शेलारकर उपस्थित होेते.