हक्काच्या घरकुलसाठी कोलद ग्रामस्थांचे उपोषण
मतिन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर
तालुक्यातील कोलद येथील ग्रामस्थांनी हक्काचे घर मिळावे यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
घरकुल योजनेचा गरजु नागरिकांना लाभ मिळत नसल्याने नागरिकांची हाकपुकार कोणीच घेत नसल्याने सतप्त ग्रामस्थांनी उपोषणाचा आक्रमक निर्णय घेतला आहे. वाण काठावर असलेल्या या गावात घरकुल योजनेच्या लाभाची यादी तयार करतांना मोठ्या प्रमानात अनियमितता झाली आहे. ज्याच्या कडे आधिच पक्के, दोन मंजली ची घरे आहेत त्यांना घरकुल देण्यात आला मग जे गरजू आहेत त्यांना का नाही? असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. जे ग्रामस्थ अतिक्रमणाच्या जागेत राहतात त्यांचा नमुना ८ अ ची ग्रामपंचायत ने नोंद घेतली नाही. ग्रामसेवक, बीडीओ यांनी दखल न घेतल्याने कोलद ग्रामस्थांनी उपोषणचा मार्ग निवडला आहे.
या उपोषण मंडपास तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर, जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब भोजने, स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे युवा विदर्भ अध्यक्ष प्रशांतभाऊ डिक्कर, पं.स.अधिक्षक खिरोडकार, भालेराव, माजी सरपंच अरुण देउकार यांनी भेट दिली.