अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी स्वाभिमानीचे जल आंदोलन
![]() |
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या! प्रशांत डिक्कर |
संग्रामपूर/ मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी आठ तास शेतामधे पाण्यात बसुन जल आंदोलन केले. पाच दिवस उलटूनही पिक नुकसानीची अजूनही पाहणी सुरू केली नसल्याने शेतकरी प्रचंड रोष व्यक्त करत शेतातील तुडुंब कमरे एवढ्या पाण्यात ८ तास बसून जलआंदोलन केले. पिक नुकसानीने शेतकरी पुर्णपणे खचुन गेला असतांना. लोकप्रतिनिधी सत्तांतराच्या राजकारणात गुंतलेले आहेत. त्यामुळे आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने.
या गद्दार आमदार खासदारांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्याने निवासी जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी तत्काळ दखल घेत भ्रमणध्वनीवर प्रशांत डिक्कर यांच्याशी संपर्क साधला व तहसीलदार वरणगावकर तालुका कृषी अधिकारी बनसोड, पं.स.चे कृषी अधिकारी साळवे यांनी त्याच जलाशयात जाऊन आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली व आजपासूनच सर्वे सुरू करून पाच दिवसात नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे लेखी आश्वासन यावेळी आंदोलन कर्त्यांना दिले. यानंतरच सायंकाळी आंदोलन समाप्त झाले. कवठळ, पातुर्डा, संग्रामपूर या तीन महसूल मंडळात १७ व १८ जुलै रोजी अतिवृष्टी झाली लगातार एकसारखा ११० मि.मी. पाऊस या परिसरात पडल्याने शेती खरडुन गेली. उभी पिके आजही पाण्याखाली आहेत. सोयाबीन तूर कापूस उडिद मुंग मका ज्वारी पीके अक्षरक्ष: सडली. अशी आपबिती असतांना अजूनही या नुकसानीची पाहणी प्रशासनाने सुरू केली नाही. सत्तांतराचा खेळात आपले आमदार, खासदार सुरत गुवाहाटी व त्यानंतर आताही मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. त्यांना या शेतकऱ्यांचे काही एक घेणे देणे नाही. असा आरोप यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलतांना केला. ज्या ठिकाणी आंदोलन कर्ते शेतात बसले होते.
त्याच ठिकाणी अर्धा किलोमीटर अंतरावर पाण्यात जाऊन वरील तिनही जबाबदार अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांची चर्चा केली. तालुक्यातील संयुक्त सर्वे करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते पाण्याच्या बाहेर आले. पाच दिवसात नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर न केल्यास तहसीलदारांचे कक्षात बसुन आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलतांना दिला.
वानखेड, दुर्गादैत्य या रस्त्यावर असलेल्या राहुल गायकवाड यांच्या शेतातील पाणी चिखलात झालेल्या या जलआंदोलनात स्वाभिमानीचे अनंता मानकर, उज्वल चोपडे, , उज्वल खराटे,विजु ठाकरे, संतोष गायकवाड,अनुप देशमुख, श्रीकृष्ण बोरोकार, विलास तराळे, योगेश घायल,राजु उमाळे,शाम ठाकरे यांचे सह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलन कर्त्यांनी या पाण्यातच ठेचा भाकरीचे भोजन केले.