अतिवृष्टीचा संग्रामपूर, जळगावला तडाखा! हजारो हेक्टर जमीन खरडली; दोनशे जनावरे दगावली
बुलढाणा : तीन चार फूट पाण्याखाली असलेली हजारो हेक्टरवरील पिके, खरडून गेलेली अन आता कायमची निरुपयोगी ठरलेली हजारो हेक्टर शेत जमीन, ठिकठिकाणी दिसून येणारे मुक्या जनावरांचे मृतदेह, जमीनदोस्त झालेली हजारो घरे आणि सर्वस्व गमावलेल्या हजारो शेतकरी व ग्रामस्थांचे उदास चेहरे.. हे चित्र आहे बुलढाणा तालुक्यातील संकटग्रस्त दोन तालुक्याचे.
निसर्ग वा वरुणराजाचे तांडव किती क्रूर असू शकते, त्याचे परिणाम किती प्रलयकारी असू शकतात याचे उदाहरण म्हणजे जळगाव व संग्रामपूर तालुके ठरले आहे. मर्यादित प्रशासकीय यंत्रणा यामुळे हा विध्वंस अधिकच ठळकपणे जानविणारा ठरतो. जळगाव व संग्रामपूर तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील होत्याचे नव्हते झाले. यातही सर्वात भीषण नुकसान अर्थात कृषी क्षेत्र व तारणहारच नसलेल्या शेतकऱ्यांचे! काही तासांच्या आत शेतजमिनीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार दोन्ही तालुक्यांतील मिळून तब्बल १२ हजार २५५ हेक्टर सुपीक शेतजमीन खरडून गेली आहे. तसेच अर्ध्या लाखांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ६० हजार २०९ हेक्टरवरील खरीप व अन्य पिकांची अक्षरशः माती झाली! यामध्ये सोयाबिन, कापूस, मका, तूर या खरीप पिकांसह संत्री, केळी व भाजीपाला यांचाही समावेश आहे. अंतिम अहवाल वा नुकसान यापेक्षाही जास्त राहणार हे उघड आहे.
छतच काय घरच उरले नाही!
दरम्यान निसर्गाच्या झंझावतात तब्बल ४३८५ घरे जमीनदोस्त झाली आहे. ५८२ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. ३८०३ घरांची अंशतः पडझड असली तरी ती राहण्यायोग्य राहिली नाहीये!
स्थलांतर
या परिणामी किमान ५२७ कुटुंबांचे स्थलांतरण करावे लागले आहे. या कुटुंबातील आपदग्रस्त सदस्यांची संख्या २१०० च्या वर आहे. सामाजिक सभागृह, शाळा अशा ठिकाणी तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहे. याशिवाय अनेकांनी नातेवाईक, दानशूर व्यक्ती वा शेजाऱ्याकडे आसरा घेतला आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाने घेतली आहे. मात्र नेते मंडळी, पदाधिकारी, सामाजिक संघटना व संस्था यांनी घेतलेला आखडता हात, व उदासीनता खुपणारी ठरावी अशीच आहे.
पशुधन हानी
अतिवृष्टी वा पुरात वाहून दगावलेल्या मुक्या जनावरांची संख्याही लक्षणीय आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा आकडा २०३ इतका आहे. यामध्ये १०९ मोठ्या तर ९४ लहान जनावरांचा समावेश आहे.